हिंदीतील आश्वासक कथानके
‘आर्टिकल १५’ च्या पोस्टरवर ‘फर्क बहुत कर लिया , अब फर्क लायेंगे’ किंवा ‘स्त्री’ सिनेमाची टॅगलाईन ‘मर्द को दर्द होगा’ त्यांच्या विषयवस्तूचा वेगळेपणा चटकन जाणवून देतात. तसेच हे दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या सिनेप्रकारांचं प्रतिनिधीत्व करतात. ‘आर्टिकल १५’ समकालीन भारतीय जातव्यवस्थेचं चित्रण करतो तर ‘स्त्री’ विनोदी-भयपटाच्या साच्यात भारतीय मानसिकतेवर भाष्य करतो पण त्याचं मनोरंजन मूल्य कमी होऊ देत नाही. ‘स्त्री’ सिनेमाचं यशस्वी होणं हिंदी सिनेमातल्या बदलत्या ट्रेंड्सचा भाग म्हणावा का? की फक्त एक चांगली कथा, चांगलं दिग्दर्शन व ओळखीचे अभिनेता-अभिनेत्री असल्यामुळे प्रेक्षकांना तो आवडला असेल. गेल्या काही वर्षात हिंदी व्यावसायिक सिनेमांनी एकाचवेळी चांगल्या कथा उत्तम पटकथेद्वारे मांडायचा सपाटा लावलाय त्याचाच हा परिपाक म्हणावा का? म्हटलं तर हो म्हटलं तर नाही. हिंदी व्यावसायिक सिनेमात पटकथेला नेहमीच दुय्यम स्थान राहिलं आहे . खासकरून अमिताभच्या सिनेमांमध्ये पटकथेपेक्षा संवादांना महत्त्व जास्त देण्यात आलं. सलीम-जावेदनी संवादांना इतर गोष्टींपेक्षा सिनेमाच्या अग्रभागी ठेवलं. त्यामुळे अमिताभ व त्यानंत...