तारूण्यातला हॉलिवुडचा न पुसला जाणारा ‘डीऽऽऽप इम्पॅक्ट’
केंद्रसरकारच्या ‘ मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ’ च्या २०१७ च्या अहवालानुसार १५ ते ३४ हे भारतीय युवक/युवतींचं तरूणपणाचं ठरवलेलं वय आहे. याचा विचार केला तर माझं तरूण असण्याचं वय कधीच सरलंय. मी तरूण राहिलो नाही असं केंद्र सरकारला वाटतंय म्हटल्यावर ते बरोबरच असणार. तारूण्य हे आकड्यांवर नसतं, असं आपण नेहमी म्हणतो. ‘ मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण ’ असा सुविचार शाळेच्या भिंतीवर वाचलेला आठवतो तेव्हा वाटतं हेही खरंय. तसं पाहिलं तर दोन्हीतही तथ्य आहे. सुविचार मनात बिंबवला तर वयाचा अडसर कधीच येणार नाही. सरकारी आकडे खरे मानले तर आपण नेमकं त्याकाळात काय करत होतो याचं सिंहावलोकन करायची ही वेळ आहे असं वाटतं. मी हे आकडेच गृहीतक मानून बोलणार आहे. १५ ते ३४ म्हणजे १९९६ ते २०१५ हे माझं तरूण असण्याचं वय. या वयाचा विचार केला तर सर्वसाधारण तरूण हे दहावी , बारावी , पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर होणे या टप्प्यातून जातात. मग नोकरी/व्यवसायाच्या मागे लागतात. त्यात जम बसतोय असं वाटायला लागलं की लग्न करतात. संसार चालू होतो. काही फॅमिली प्लॅनिंग वगैरे केलं नसेल तर लग्नाच्य...