कोरोना काळ, फोबिया आणि दहशत
जानेवारीत नेहमीसारखी वर्षाची सुरूवात झाली. आयुष्य नॉर्मल होतं. दिल्लीतील विद्यापीठात विद्यार्थ्यांवर हल्ला झाला म्हणून मोठ्या प्रमाणात निदर्शनं चालू झाली होती. फेब्रुवारीत परत दिल्लीतच दंगली उसळल्या. केंद्र सरकारच्या या फेजमध्ये अजून काय काय बघायला मिळणार अशी चर्चा ऐकू यायला लागली. याच काळात चीनमध्ये कोरोना नावाचा एक व्हायरस पसरला आहे. तो संसर्गजन्य आहे. त्याने तात्काळ माणूस मरतो असं ऐकण्यात यायला लागलं. इटलीमध्ये केसेस वाढायला लागल्यावर इतर देशात सुद्धा तो पसरतोय हे बातम्यातून कळायला लागलं. विमानाने प्रवास करणाऱ्यांमुळे तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीभर पसरतोय असं सुरूवातीच्या पाहणीतून लक्षात आलं. पँडेमिकची सुरूवात झाली होती. ३० जानेवारीलाच वूहान प्रांतातून परतलेल्या केरळमधील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. तो भारतातला पहिला कोरोनाबाधित. २४ मार्चला रात्री बारापासून देशात लॉकडाऊन करण्यात आलं. ते का केलं, कशासाठी केलं हे कळण्या अगोदरच सगळं बंद करण्यात आलं. जीवनावश्यक वस्तू घेण्याची मुभा असली तरी संपूर्ण शहर बंद केलं गेलं होतं. लातूर बंद किंवा भारत बंद बघण्याची सवय अस...