न भावलेला ‘सुपर ३०’
ऋतिक रोशन अभिनीत ‘सुपर ३०’ मधील सर्वात चांगला प्रसंग म्हणजे आनंदकुमारला लल्लनमुळे आपण किती मोठी घोडचूक केली याची जाणीव होते तो. सिनेमातील इतर गोष्टी मात्र नेहमीची कथा वाटली. मी व्यक्तिशः शिक्षणव्यवस्थेवरील भारतीय सिनेमांपासून दूरच राहतो. त्याला एक कारण आहे. मी एकूण बारा वर्षे महाविद्यालयात घालवली आहेत. बारावी सायन्सची दोन, बीकॉमची दोन, बीएस्सीची तीन वर्ष (बीकॉम-बीएस्सी मिळून पाच वर्ष. सर्व विषयात नापास.) आणि त्यानंतर बीए-एमए. महत्त्वाच्या सर्व विद्याशाखांचा अनुभव घेतल्यामुळे एकूणच शिक्षणाबद्दल आजही मनात कटुताच आहे. त्यामुळे सिनेमात जेव्हा शिक्षणावर भाष्य केल्याच्या थाटात कथा मांडली जाते तेव्हा मला त्याचवेळी अंदाज आलेला असतो की कथानक खूपच ढोबळ स्वरूपात मांडलेलं असणार. वास्तव दाखवण्याचं धारिष्ट्य अजून तरी निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवलेलं नाही. चर्चेपुरती चटकन आठवणारी नावे म्हणजे ‘दहावी फ’, ‘तारे जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’. तिन्हीत शिक्षणव्यवस्थेचं बऱ्यापैकी चित्रण केलं आहे. तरीही मला हे सिनेमे तितकेसे प्रभावी वाटत नाहीत जितके ते असावयास हवेत. त्याचं कारण आपल्या सामाजिक रचनेत व नेणीवेत आह...