आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग १


आजच्या श्रावणबाळांचं दुखणं असं म्हणतो तेव्हा मला सध्याच्या काळात जगणाऱ्या माझ्या वयाच्या व जे पंचवीस ते पस्तीस या वयोगटात आहेत ते तरुण अपेक्षित आहेत. तसेच पंचविशीच्या खालचे सुद्धा यात येतात. आमच्या पिढीचं दुखणं मांडण्या आधी आम्ही कोणत्या पिढीत जन्मलो हे जाणून घेणं गरजेचं आहे. चर्चेपुरतं मी ज्या लातूर शहर व परिसरात वाढलो त्याचा हवाला देणार आहे. माझं असं मत आहे की आमचा मराठवाडा हा भारतीय समाजाची एक पेट्री डिश आहे जिच्यात आपण कसलंही कल्चर तयार करून त्याचा अभ्यास करू शकतो. प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीकरिता एक कल्चर तयार करून त्याचा अभ्यास करता येईल. कारण मराठवाड्याचा संपूर्ण भूभागच भारतीय समाजाचा एक अत्यंत ज्वलंत, जिवंत तुकडा म्हणून देखील बघता येईल. किंवा असे म्हणता येईल की भारतीय मानसिकतेचा उभा छेद घेतला तर मराठवाडा त्याचं उत्तम उदाहरण ठरेल ज्यात सर्व प्रकारचे नमुने, वृत्त्या-प्रवृत्त्या दिसून येतील. एका अर्थाने मराठवाडा हे भारतीय समाजाचं जीवशास्त्रीय कल्चर आहे असं म्हणायला हरकत नाही.
पार्श्वभूमी
आमच्या पिढीचा जन्म कधी झाला हे जाणून घेण्याआधी आमच्या आई-वडिलांची पिढी कधी जन्मली ते जाणून घेणं गरजेचं आहे. १९५० ते १९६९ या काळात जन्माला आलेली पिढी म्हणजे आमच्या आई-वडिलांची पिढी. तसेच १९४५ ते १९४९ मध्ये जन्मलेले सुद्धा यात येतात. ही मंडळी आज सत्तरीच्या वर आहेत. १९७० ते ७९ मधली पिढी ही चाळीशी पार केलेली मंडळी आमच्या व आई-वडिलांच्या पिढीच्या मधे येतात. यांच्याविषयी काही तक्रार नाही. त्यांनी दोन्ही पिढीत स्वतःला सामावून घेतलं आहे. आमची पिढी म्हणजे १९८०, १९९० व २००० साला नंतर जन्मलेली.
आढावा
जन्माची पार्श्वभूमी वाचल्यावर मी कुणाबद्दल बोलणार आहे ते कळून येईल. त्याआधी आमच्या आई-वडिलांच्या पिढीची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी काय होती ते बघुयात.
·  १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळणे. १९५० साली राज्यघटनेचा स्वीकार होणे.
· ही पिढी खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतातली पहिली पिढी म्हणता येईल अशी होती जिला जन्मल्या जन्मल्या घटनेनुसार या सार्वभौम देशाचं नागरिकत्व मिळालं. यांची घरं मध्यमवर्गीय, निम्न-मध्यमवर्गीय किंवा गरिबांची होती.
· जातीय-धार्मिकतेचे संस्कार यांना घरातूनच मिळाले. त्यामुळे कट्टर जात्यांधता आलेली. अतिभावनिक, देवभोळेपणा, कर्मकांड, व्रतवैकल्ये, रूढी, प्रथा बिनबोभाट पाळणे. स्वजातीत यांनी लग्ने केली.
· राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार, लता-आशा-किशोर-रफी यांचा आवाज व शंकर-जयकिशन व इतरांचं संगीत ऐकण्यात यांचं बालपण गेलं.
· पहिल्या वेतन आयोगाची स्थापना यांच्या जन्माच्या चार वर्ष आधीच झालेली. यांच्या वाढीसोबतच वेतन आयोग ही दर दहा ते बारा वर्षांनी लागू व्हायला लागला.
· मराठवाड्याने विनाशर्त महाराष्ट्रात सामील होण्यास होकार दिला. कर्नाटक व आंध्रातून शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबे मराठवाड्यात येऊ लागली. विविध शाळा, कॉलेजेसची स्थापना व्हायला लागली. मराठवाड्यातील तालुके व जिल्ह्याच्या ठिकाणांचे हळूहळू नागरीकरण व्हायला लागले. मराठवाड्याची निम-शहरीकरणाकडे वाटचाल चालू झाली.
· सत्तरचा भीषण दुष्काळ यांनी पाहिला.
· पंच्याहत्तरची आणीबाणी यांनी अनुभवली. ते वर्ष यांच्या पंचविशीचं होतं. राज कपूरचा यांचं प्रतिनिधीत्व करणारा ‘बॉबी’ प्रदर्शित झाला.
· सरकारी नोकरीच महत्वाची असते याची जाणीव याचवेळी यांना झाली. खाजगी आस्थापनांची संख्या कमी असल्यामुळे व व्यवसाय करणे मारवाडी-गुजरात्यांचं काम असल्यामुळे नोकरीतील सुरक्षितता गरजेची वाटायला लागली.
· ऐंशीच्या दशकात आमच्या पिढीचा जन्म झाला. त्याच दशकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीची हत्या झाली. राजीव गांधी पंतप्रधान झाले. कम्प्युटर व टेलिफोन सर्वदूर पसरवण्यासाठी त्यांनी राजकीय पावले टाकली. नंतर त्यांची हत्या झाली.
· नरसिंहराव व मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केली. बाबरी मशीद पाडली गेली. मुंबईत बॉम्बस्फोट व दंगली उसळल्या. हिंदुत्ववादी मानसिकतेची लोकं एकत्र यायला लागली. किल्लारीला भूकंप झाला. ट्वीन टॉवर्सवर हल्ला झाला. त्याचवेळी आयटी क्षेत्राची वाढ व्हायला लागली.
· सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची स्थापना व अंमलबजावणी झाली. ही पिढी सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी निवृत्त झाली. तिला महिन्याकाठी किमान ६०००० रू. निवृत्ती वेतन स्वरूपात मिळतात.
आढावा का घेतला?
आमच्या पिढीचं दुखणं कशात आहे तर आमच्या आई-वडिलांशी असणाऱ्या नात्यामध्ये हे कळण्यासाठी आढावा घेतला. भारतीय समाजात आई-वडील या संस्थेला अतोनात महत्त्व आहे. ते किती हे पूर्वापार मौखिक पद्धतीने चालत असलेल्या दोन कथांमधून बघायला मिळेल.
  • पहिली कथा:[1] एकदा शिव-पार्वती नारदाने दिलेला खास आंबा गणेश-कार्तिकेयाला देणार असतात. पण आंबा कुणा एकालाच देणं गरजेचं असतं. त्यावर शिव-पार्वती एक स्पर्धा घ्यायची ठरवतात. जो कुणी तीनदा पृथ्वी प्रदक्षिणा करून प्रथम येईल त्याला आंबा मिळेल. कार्तिकेय लगोलग पृथ्वी प्रदक्षिणा करायला जातो. तो जाऊन येईपर्यंत गणेश शिव-पार्वतीला तीन प्रदक्षिणा करून त्यांच्यासमोर हात जोडून नतमस्तक होऊन थांबतो. कार्तिकेय येतो. तो ही शिव-पार्वतीला हात जोडून उभा राहतो. पण आंबा देताना शिव-पार्वती ते गणेशाला देतात. का? तर त्याचं कारण खूप योग्य असतं. आपल्यासाठी आपले आई-वडीलच जग असतात त्यामुळे त्यांच्यासमोर नतमस्तक होणे हे आपले कर्तव्य आहे. या त्याच्या बुद्धिवादी उत्तरामुळे तो आंबा त्याला मिळतो. तात्पर्य: तीनदा पृथ्वी प्रदक्षिणा व तीनदा आई-वडिलांची प्रदक्षिणा हे सारखेच असते कारण आई-वडीलच आपले विश्व असतात.
  • दुसरी कथा:[2] रामायणात श्रावण बाळ नावाचा मातृपितृ भक्त मुलाची कथा सांगितली जाते. आपल्या अंध आई-वडिलांना तीर्थयात्रा घडवून आणण्यासाठी त्याने त्यांना कावडीत बसवून यात्रा घडवून आणली. परतीच्या प्रवासात अयोध्येजवळ जंगलात मुक्कामास असताना आईला पाणी प्यायची इच्छा होते म्हणून श्रावण शरयू नदीकाठी जातो. पाण्यात कमंडलू बुडवला असता त्या आवाजाला भेदणारा एक बाण कुठूनसा तरी येतो व त्याचा वेध घेतो. त्याचा मृत्यू होतो. बाण राजा दशरथाने मारलेला असतो. परिमार्जन करण्यासाठी दशरथ पाणी घेऊन आई-वडिलांकडे जातो. घडलेलं कथन करतो. आई-वडील अतीव दुःखाने प्राणत्याग करतात. तत्पूर्वी त्याला शाप देतात की तो ही त्यांच्यासारखाच मुलाच्या वियोगाने तडफडत मरेल म्हणून. तात्पर्य: आई-वडिलांची सेवा करणे हे मुलाचे आद्य कर्तव्य आहे. तेच त्याचे परम कर्तव्य आहे. आई-वडिलांची सेवा पुण्य प्राप्तीचा मार्ग असतो.
दोन्ही कथांचं आजच्या कालानुरूप विश्लेषण करण्याआधी एकूणच भारतीय आई-वडिलांची मानसिकता यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे.
मानसिकता
वर आढावा घेतलेल्या मुद्द्यामध्ये भारतीय आई-वडिलांची मानसिकता यावर काही लिहिलेलं नाही कारण ती मानसिकता काय असते ते घरात होणाऱ्या बदलांवर अवलंबून असतं. आमच्या पिढीत सर्वात मोठा बदल घडला तो दोन ठिकाणी. पहिला बदल घडला शालेय स्तरावर ‘लातूर पॅटर्न’ मुळे व दुसरा बदल घडला आयटी क्षेत्राची झालेली वाढ. ‘लातूर पॅटर्न’ मुळे खूप गुण घेऊन यशस्वी होणे ही प्रतिष्ठा झाली होती. तर आयटी क्षेत्रामुळे एनआरआय होण्याचं प्रमाण वाढलं. सोबतच पैसा यायला लागला. त्यामुळे पत्राचे शेड, अर्धवट बांधलेल्या खोल्या किंवा मोकळ्या प्लॉट्सवर टोलेजंग इमारती उभ्या राहायला लागल्या. त्यामुळे पुढचा टप्पा पार करण्यासाठी आमच्या पिढीचं लग्न होणं गरजेचं होतं.
मानसिकतेचा पहिला अनुभव यायला लागतो जेव्हा लग्न हे स्वजातीतल्या मुलीसोबतच व्हायला हवं असं ठणकावलं जातं तेव्हा. तसेच पोट-जातीतली मुलगी एकवेळ चालेल पण आपल्याच जातीतली असावी, हा दंडक. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडायचं नाही अगदी स्वजातीतली असली तरी. त्यामुळे प्रेमविवाह निषिद्ध. त्यामुळे परजातीतल्या मुलीच्या प्रेमात पडलं तरी त्याला घरातून संमती मिळणे मुश्कील. मुलाने एक तर घर सोडावे किंवा मुलीला तरी. मुलगा आई-वडिलांच्या इच्छे व प्रेमाखातर घरच्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करायला तयार होतो. थाटामाटात लग्न होतं. मनपसंत सून घरात येते. कुलदैवताच्या वाऱ्या होतात. नवीन सुनेचं कौतुक पहिला नातू होईपर्यंत चालूच राहतं. नातू झाल्यावर आयुष्य सार्थकी लागल्याची भावना निर्माण होते कारण वंशाला दिवा मिळालेला असतो. दरम्यानच्या काळात सून घरात स्थिरावलेली असते.

पूर्वप्रसिद्धी : शब्दायण दिवाळी २०१९



Comments